Monday, 10 October 2016
श्री तात्याकाकांचीच चर्चा चालली होती. डॉक्टरनी छत्तीस तासाची दिलेली मुदत उलटूनही अठ्ठेचाळीस तास उलटून गेले होतेे. गल्लीतलं धाक वाटावा, आधारही असावा असे तात्याकाका. घारे गोरे , संस्कृत स्तोत्रे शेकड्यानी पाठ, इंग्रजी फर्डा, शिक्षकी पेशा, अडल्यानडल्यासाठी भिक्षुकीही करणारे, सतत वाचन चाललेलं , स्मरणशक्ती तल्लख, तापट वाटायचे पण कुणाशी भांडताना बघितलेले नाही. नजर इतकी भेदक की आर्या अपार्टमेंटच्या बेसमेंटमधे तीन पानी सुरू झालाय कळल्यावर तात्याकाका फक्त तिथे गेले आणि कोण कोण आहेत त्यांच्याकडे एकदाच बघून, अवाक्षर न उच्चारता परत आले, पण तीनपानी बंद झालं ते आजतागायत बंदच आहे. मंगलकार्याचे आमंत्रण घेऊन गेलं की यशस्वी व्हा ,मंगल होईल सगळं , हा ठरलेला आशीर्वाद, घेणा-याच्या अंगात उर्जा निर्माण करून जायचा. बाकी बोलणं नसायचं पण अश्यावेळेस नेहरूशर्टाच्या खीशात हात जायचा, हाताला येईल ती नोट बाहेर निघायची आणि आशीर्वादाबरोबरच सुहास्य मुद्रेनं समोरच्याला दिली जायची. चार महिन्यापुर्वी पाय घसरायचं निमित्त झालं , खुब्याचं हाड मोडलं , तात्याकाका अंथरूणाला खिळले. दुखणं बळावत गेलं, दुखण्यापेक्षा परावलंबीत्वाच्या भावनेनं तात्याकाका मनातून खचले. चार दिवसांपासून फक्त लिंबूपाणी चमच्या चमच्याने भरवणं चालू होतं, अंगातले त्राण संपलेले. बोलणं ही बंद झालं ताकद कमी पडत होती. उजव्या हाताची तर्जनी हालत होती तेवढीच हालचाल, कळत होतं ते नजरेवरून समजत होतं, गल्लीवर अवकळा पसरली होती. सकाळपासून तात्याकाका ओठ हलवत होते काहीतरी सांगायचं होतं , पण नियती …. आमची तीच चर्चा चालू होती , काय हवं असेल तात्याकाकांना, सुन, मुलगा, नातू सगळी आली होती. समोर होती पण नक्की काय हवय त्यांना कळत नव्हतं इतक्यात श्री आला. पल्सर स्टँडला लावायच्या पद्धतीवरूनच कळलं स्वारी “कार्यक्रम” उरकून आलीय. वडिलोपार्जीत शेतीचं बक्कळ उत्पन्न , शेयर्सचा किडा , नोकरी धंद्याची गरज नव्हतीच. शेयर्समधून उत्पन्न चालूच , व्याजानं पैसे देतो माहिती कळली होती. श्री त्यामुळे दुपारनंतर रंगातच असायचा, अपवाद संकष्टी, बुधवार, शनीवार संध्याकाळ ह्या तीन वेळेस श्री व्यवस्थित असायचा. बुधवार , शनीवार संध्याकाळचा दोन तीन तास जायचा कुठेतरी नक्की कुणालाच माहित नव्हतं. दारू सोडली तर माणूस सरळसोट होता, तांबारलेले डोळे गैरसमज करून द्यायचे हे नक्की. गल्लीत मंडळाचे कार्यकर्ते वर्गणीला गेले तर मुंहबोली वर्गणी मिळायची. तेवढाच त्याचा संबंध , बाकी दिसायचा नेहमी पण आपल्याच रंगात. श्रीनं पल्सर लावली, त्याच्या लक्षात आलं आम्हा चारपाचजणांच्या चेह-यावरचे भाव कळले की काय देव जाणे , पण श्री निमूट शेजारी येऊन उभा राहिला, खाडीलकरांना विचारलं जड जिभेनं काय झालय ?, बारीकशी आठी आलीच खाडीलकरांच्या कपाळावर , दर्पानी, पण सांगीतलं श्री ला. अरे तात्याकाकांचं अवघड झालय, काहीतरी सांगायचय ,ओठ हलतायत पण कळत नाहीये , कशात तरी जीव अडकलाय त्याकरता जीव सुटत नाहीये, त्यांचं बघवत नाहीये रे. श्री विचारात पडल्यासारखा दिसला. पाच दहा मिनीटे गेले तशी माझ्या खांद्यावर हात ठेवत श्री नजरेत नजर मिसळून म्हणाला, जोशीकाका , चल वर , भेटूया तात्याकाकांना. मी अचानक बोलण्याने हादरलो, आधीच तात्याकाकांच्या नजरेचा धाक होताच, आणि श्री लोड होता. त्या वातावरणात काय घडेल सांगता येत नव्हते, इतक्यात श्री म्हणाला , चल वर, शप्पथ तात्याकाकाला वाईट वाटेल असं काहीच करणार नाही. त्याचा संथ शब्दातला ठाम विश्वास जाणवला, खाडीलकर ओकांना चोरट्या नजरेनी इशारा केला आणि श्री ला म्हटलं चल. वर जायच्या आधी पार्कींगच्या नळावर तोंडावर पाण्याचे हबके मारलेन श्रीनं, चुळा भरल्या खळखळून , आणि पॉकेटमधून खैनीची एक चिमूट गालफडात सरकवून श्री निघाला, मी मागून. खाडीलकर ,ओक माझ्या मागे. एक वेगळाच भाव दिसत होता चेह-यावर . तात्याकाकांच्या खोलीत शिरतानाच म्हणाला, जोशीकाका तू विचार काकांना काय हवय? दडपण बाळगत आत गेलो , तात्याकाकांची नजर वळलीच, तात्याकाका तुम्हाला भेटायला श्री आलाय , बघा , तुम्हांला काही हवय का ? तात्याकाकांचा मुलगा न्याहाळत होता श्री ला. खोलीतली माणसांचीही वेगळी परिस्थिती नव्हती. तात्याकाकांनी मला ओळखलं , त्यांचे ओठ हलायला लागले , तर्जनी थरथरत होती, माझ्या डोळ्यातून अश्रू केव्हा बाहेर पडले कळलच नाही, अगतीक झालो होतो. तात्याकाका काहीतरी सांगतायत पण आपल्याला कळत नाहिये. दोनेक मिनीटं गेली असतील. तात्याकाकांचे ओठ हलणं बंद झालं, त्यांची नजर माझ्यावरच रोखलेली होती, मागून श्री पुढे आला. तात्याकाकांच्या पालथ्या हातावर त्यानी हात ठेवला, दोघांची नजरानजर झाली, श्री चे शब्द आणि दर्प एकदमच आले. तात्याकाकांच्या नजरेत झालेला बदल जाणवला सेकंदभर आणि श्री उद्गारला तात्याकाका, निर्वाणषटक म्हणूयात का ? चारच शब्द, तात्याकाकांच्या भूवया ताणल्या गेल्या ओठ हलले , आणि शांत , संथ आवाजात श्री नी सुरूवात केली मनोबुध्यहंकार चित्तानी नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे । न च व्योमभूमी न तेजो न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ तात्याकाकांचे ओठ आता हलताना कळत होतं , श्री बरोबर ते ही म्हणतायत. खोलीत सगळीच भारावल्यासारखी श्री ला साथ देऊ लागली. तात्याकाका आणि श्री दोघांच्याही डोळ्यातून पाणी झरायला लागलं . अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां । सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं एवढं श्री च्या तोंडून ऐकलं आणि तात्याकाकांनी डोळे मिटले पुन्हा न उघडण्यासाठी. प्राणपाखरू मुक्त झालं. श्री खाली आला , ओक्साबोक्सी रडत होता. मधेच बोलला, काका , देवानं सगळी सुखं दिलीत , पण माझी बहिण मुकी आहे रे , अपघातात वाचा गेली. तिच्या ओठांच्या भाषेत बोलण्याचा आज तात्याकाकांना उपयोग झाला, त्यांची इच्छा पूर्ण झाली. नियती फार फार करते, करवून घेते. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत राहिलो, दोघांचेही उमाळे सुरूच राहिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment