Sunday, 30 April 2017

बाल्कनीत चकरा मारणा-या अनिलकडे सुरेशराव पलंगावर पडल्या पडल्या बघत होते. साडेदहा वाजत आले तरी अनिल अजून खोलीत परतला नव्हता. खोलीतला लाईट चालू होता म्हणजे अपर्णा ही जागीच असणार. बाल्कनीच्या दरवाज्याशेजारी विराजचं नोटस् काढणं चाललं होतं.
उद्या टेस्ट आहे म्हणल्यावर तो रात्री जागणार हे होतंच. खरं तर सुरेशरावांना जिन्यातून खाली घेऊन जाणं , रिक्षातून गणपती मंदिरात नेणं आणि परत आणणं ही सगळी दगदगच होती अनिल अपर्णाची. पण गणपतीनंतर आज बाहेर पडल्याने , मंदिरात चार ओळखीचे गाठ पडल्याने आणि गणपतीचे मनोहारी रूप पाहिल्याने सुरेशराव प्रचंड खुष झाले होते.

पंधरा वीस मिनिटांनी अनिलनी येरझा-या थांबवल्या, बाल्कनीच्या कठड्यावर दोन्ही हात ठेवून स्तब्ध उभा राहिला. एकदा विचार झटकल्यासारखी मान हलवली आणि परतला. आला तो सुरेशरावांच्या पलंगाजवळ.

“बाबा, दुखत नाही नं काही ? काही लागलं तर सांगा, हाक मारा काय.”

सुरेशरावांनी नकारार्थी मान हलवली.

“अन्या , बैस जरा इथे”

अन्या बसला.

“ काय विचार ?”

“काही नाही , आमरसामुळे जरा फे-या मारल्या हो”

“अन्या, तु सांगतोयस की मी बोलु ?”

“हं , बाबा, खरच विचार करत होतो, तुमच्यापासून लपून काही रहात नाही. ही दुसरी अक्षयतृतीया. नोकरीला लागल्यापासून दरवर्षी एक ग्राम सोनं घ्यायचं आई सांगायची ते करत आलो. तेच लक्ष्मीपुजनाला पुजायचं. दिवाळीला खर्च जास्त म्हणून आज. त्यात कधी खंड पडला नाही .पण या दोन वर्षात झालं नाही हो “

“अन्या , वाटलंच होतं मला, हिच्या क्यान्सरला तु किती काय केलंस माहित नाहि का मला ? मागच्या जानेवारीचा अँक्सीडेंट , मी पायानं पंगू झालो, कमी का केलंस ? “

अन्या, एक सांगतो तुला , हि नं सवय लावली ती सोन्याची गुंतवणूक व्हावी म्हणून .आज तुला सांगतो , अक्षय तृतीयेची खरेदी अक्षय रहाते घरात. तसंच आज काही दिलं , दान केलं तर तर ते ही अक्षय होतं हे माहितीय का ? “

“ म्हणजे काय ?”

“अन्या , अप्पा सांगायचे आजच्या दिवशी जे द्याल, अर्पण कराल, दान कराल त्याचं पुण्य अक्षय होतं ,आणि आज तु दोन गोष्टी दिल्या आहेत. निश्चिंत रहा. असं दिलंयस की जे अक्षय रहाणार आहे”

अनिलचा विचारात  पडलां. खरेदी तर करता आली नाही आणि बाबा काय म्हणताहेत. काही चुकलं तर नाही नं ? म्हणून आडमार्गानी सांगताहेत. दिलं काय मी ? काहीच नाही.

तोपर्यंत अपर्णा ,अजून अनिल कसा आला नाही विचार करत , अर्धवट जांभई देत अनिलच्या मागे येऊन उभी राहिलेली. सुरेशरावांचं बोलणं तीनं ही थोडं ऐकलेलं.

“अन्या, आज तु काय दिलंयस ठाऊकाय ? एक म्हणजे खोलीत आधाराशिवाय उभा राहू शकत नाही मी, ते गणपतीचं दर्शन घडवलंस , एका वृद्ध पंगूला ईश्वरदर्शन घडवलंस, माझ्या मनांला आनंद दिलास. लहानपणी तुला आम्ही देवदर्शनाला न्यायचो आज देवाचं दर्शन तु मला घडवलंस. हा पुण्याचा ठेवा , माझे आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी रहातील “
बोलतांना सुरेशरावांचे डोळे चमकत होते, आवाज भरून यायला लागला होता.

“बाबा, अहो आम्ही जाणारच होतो नं ? तुम्हालाही नेलं , एवढं काय ?”

“अपर्णा , तु ही अन्याला साथ देते आहेस हे खुप छान वाटतं गं. आजकाल आईबापाला जसं झिडकारतात त्यातले तुम्ही नाहीत हाच नशिबातला ठेवा आहे आमचा.

अन्या , अप्पा माईंशी आम्ही जे वागलो ते पाहून आज तसंच तुम्ही दोघं वागता आहात. आमचा वारसा तुम्ही घेतलाय याची जाणीव आज करून दिली. आणि दुसरं म्हणजे, तोच वारसा तुम्ही विराजपर्यंत पोहोचवलात. आज आपण घरी आल्यावर, तुम्ही दोघंही दमलेले पाहून ,  नोटस बाजूला ठेऊन ,पटकन विराजनी चहा केला  न विचारता, ते पाहिलं आणि चटकन जाणवलं “

“अन्या अपर्णा, सोनं घेता आलं नाही म्हणून वाईट वाटणं सहाजिक आहे , पण पोरांनो या गोष्टीचं जे दान तुम्ही दिलंत यानी मी तृप्त झालोय. हा संचिताचा ठेवा अक्षय राहिल , कधीही न संपणारा.”

अनिलच्या हातावर अलगद थोपटून सुरेशराव म्हणाले “चला, झोपा आता , पहाटे उठायचं नं ? “

एक मनाला लागलेली टोचणी निवळल्याने , अनिल अपर्णा खोलीकडे जाऊ लागले.

Monday, 24 April 2017

आता आसन स्थिर झालं.
दोन्ही हात पोटावर एकमेकांवर पालथे घेतलेत.
पाठीचा कणा सुरूवातीला ताठरलेला पण आता किंचीत सैलावलेला.कोणताही ताण नाही.
दृष्टी अर्धोन्मिलीत , पापण्या जडावल्यात. बुब्बुळं जणू स्थिर झालीयत.
श्वास आत येतोय , बाहेर पडतोय पण एका शांत सुरेख लयीत.
श्वासाचे आगमन सुखकारक थंडाव्याची जाणीव करून देणारं.
श्वास खोल घेतला जातोय आतपर्यंत , परंतु कुठलाही ताण नाही , मनातील तणाव धिम्या गतीने कमी होऊ लागलाय.
मस्तिष्कात गरगरणा-या विचारांची आवर्तनं हळूहळू मंदावलीत.
आता एक आकाशी, जांभळया रंगाचा काळसर पडदा विरलावस्थेत नेत्रपटलांना सुखावू लागलाय.
एक अपूर्व प्रगाssssssssssढ शांतता

ऊजव्या खांद्यावर थोपटल्याचा आभास,
शांतपणे दृष्टीचा प्रवास उजवीकडे.
गौरवर्ण , व्यक्तीचा क्रोधांगाराने तप्तायमान झालेला चेहरा आणी कर्णपटलावर ध्वनिकल्लोळ येऊन आदळतो
' जोशीकाका कामाच्या पाट्या टाकताय ते माहीती होतं , आता डूलक्या मारायलाही सुरूवात काय ? धन्यैय ,पगार कामाचा मिळतो ध्यानात असू द्या '

तीन मिनिटांनी कण्हत कुंथत कुंथुगिरी आविर्भावाने कारकुनी कामाचा प्रारंभ होतो

एप्रिल, मे महिना.

सुट्टीचा दिवस.

सकाळी मॉर्नींग वॉकपासून घामाचा चिकचिकाट.😏😏

ठंडे ठंडे पानीसे नहाकर बाहेर येईस्तो पुन्हा घाम.

बाजारात पिशव्या घेऊन चक्कर मारून यावी.

उन्हाच्या झळा सोसत, गाडीच्या ह्यान्डलला पिशव्या अडकवून परतावं.

घरी बसल्यावर , गरम हवा फिरवणा-या पंख्यानी वात यावा.

सरबत , पाणी ढोसत , कंटाळलेल्या मठ्ठ चेह-यानी टीव्हीवर निरर्थक काहीतरी बघत बसावं. 🤓

दुपारी रणरणणं जास्तच जाणवावं.

घरातली पीकली पानं, बसल्याजागी हाश्श हुश्श करत आमच्याकाळी असं नव्हतं हे पर्फेक्ट करवादून टाकणारं वाक्य हुकमी पद्धतीने टाकतात ते ऐकावं.😬😖😖

सुट्टीचा दिवस म्हणून आलु परोठे , सुरळी वडी , आणि नितांतसुंदर मोहक आमरस पुढ्यात यावा.

यथेच्छ भोजनोपरांत, बनियन, अर्धचड्डीत , नुसत्याच जमीनीवर उसाडावर डोस्क टेकून चीप पडून रहावं .

जडावल्या पापण्या असतांना एक चीरपरीचीत आरोळी कानी यावी.

ताडकन उठून , स्टेनलेस स्टीलच्या गंज घेऊन,  आहे त्याच पोषाखात धावत जावं, आणि पुन्हा धावत परतावं, मग  एक हात कुल्फीखाली धरून , स्लीssक , स्लुsssक आवाज करत थंडगाsssssssssssर , कुल्फीनंदी तल्लीन व्हावं . 😍😍

आलेला उन्हाळा काही क्षण हवाहवासा वाटू लागतो.

Friday, 21 April 2017

बिट्टयाकाका

“राजू तु प्रश्न विचारला होतास नं ? का रडवलीस सायुला जाताना ? ऐक , आत्ताच आनंदचा फोन झाला, आणि धावत तुझ्याकडे आलो. अरे त्या पोट्टीला रडून पाठवताना मला तरी कुठे आनंद झाला होता ?”

बिट्टयाकाकाच्या पापण्या बोलतानाच ओलावल्या.  राजूला प्रसंग आठवला सात दिवसापुर्वीचा. सायली , त्या सगळ्यांची लाडकी सायु , तिच्या मांडव परतणीचा.  अडीच महिन्यांपुर्वी लग्नाचा निर्णय पक्का झाला.साखरपूडा झाला, तयारी आमंत्रणं, केळवणं ,फोनाफोन्या, तया-या, धामधुमीचा काळ , सगळी गडबड आजच्या दिवसाकरता. लग्न झोकात लागलं .

जोश्यांची सायु आज वैद्यांच्या आनंदाची जीवनसंगिनी झाली. जिलबी मठ्ठयाच्या आग्रहानी तुंडूंब झालेली , विधी आवरल्याने, पाच सहा चे गट करून गप्पा मारत, विसावलेली मंडळी.म्हणता म्हणता ती वेळ आलीच.

शकुनाच्या हळदीनं गोरी झालेली सायु, हातापायाला चॉकलेटी काळपट खुललेली मेंदी. आनंदसोहळ्याची लकाकी चढलेली चेह-यावर. बंड्यामामाची हिरवीकंच, भरजरी बुट्टेपदराची पैठणी, पायात पैंजण, जोडवी, केसांत माळलेले मोगरा, जुईचे गजरे, मुंडावळ्या आणि होमामुळे चुरचुरलेले न फ्लँशच्या चकमकाटाने दीपलेले डोळे. नाही म्हंटलं तरी दमणूक झालेली जाणवायला लागली होती. आनंदचीही परिस्थिती वेगळी नव्हती.  जरबेरा, अँथुरीयम फुलांनी, स्प्रींगेरीनं, फुग्यांनी,सजवलेली गाडी हॉलच्या दारात लागली, आणि सगळा गोतावळा दाराशी जमला.

राजू, मनिषानी आधीच कल्पना देऊन ठेवल्यानी , संथपणे प्रत्येकासमोर येणा-या सायुला, हँप्पी जर्नी वगैरे करणं चाललं होतं , सायु कसंनुसं हसत भेटत होती, वडीलधा-यांना नमस्कार करत होती जोडीनं .

  मागच्या आठवड्यात मायलेकीनी बापासहित, उमाळे, आसवांना मुक्त करत रात्र जागवली होती.किती आठवणी …..

वैद्य कुटूंबात सायु पडली ही भाग्याची गोष्ट होती. म्हणूनच मांडव परतणी हस-या चेह-यानी करायचं ठरलं होतं. पण सायु गाडीतून गेली की कायमची वैद्य झाली ही कल्पना मनात असली  , कसनुसं हसत असली, तरी मनात टोचत होतीच.  सायु गाडीत मागच्या सीटवर बसली, दार लावून घेतलं, आनंद राजू मनिषाच्या पाया पडला. राजूनी आनंदला मिठी मारली , पाठीवर थोपटलं आणि तोंडातून शब्द उमटले
“ या, जावईबापू “
आणि नकळत मनिषाचा हात घट्ट पकडला. हातांची थरथर जाणवत होती दोघांनीही, पण हस-या चेह-यानी टाटा केलंन. आनंद पलीकडून गाडीत बसला, गाडी सुरू होणार इतक्यात, भक्कम आवाजात बिट्टयाकाका म्हणाला,
” आनंदराव, कोकोनट हेयर ऑईलच्या बाटल्या जातानाच घेऊन जावा, हो आता आमच्या सायुशी लग्न केलाय, काही दिवसात बिट्टयाकाकासारखं अळूचं पान होईल, केस गळून , ह्या ह्या ह्या “ 

वातावरणातला ताण क्षणार्धात नष्ट झाला, सगळा माहौल हास्याच्या फवा-यात रूपांतरीत झाला.

“बिट्टया, सुधर रे पोट्टी सासरला जायला निघाली नं तुला थट्टा सुचतीय “

हसता हसता राजू म्हणतोय, तोवर पुन्हा धाडकन दार उघडून सायु झटक्यात बिट्टयाकाकापाशी आली आणि कुशीत शिरल्यावर आतापर्यंतचा संयमाचा बांध  तुटला. हलक्या हातानं बिट्टयाकाका थोपटत राहिला. त्याच्याही डोळ्याचं पाणी खळेना.  त्या काही क्षणात कायकाय आठवून गेलं. दहावीनंतर पुण्याला जायचं स्वप्न सायुनं बोलून दाखवलं , तिला फॉरीन लँग्वेजमधेच करीयर करायचं होतं. राजू मनिषा दोघानाही काळजी. पोरगी या छोट्या शहरात वाढलेली , पुण्यात कसं व्हायचं ? त्यापेक्षा तिथेच काय करायचं ते करावं हा साधा मायेपोटी विचार. पण वज्रदेही भीमाच्या आवेशात सायुच्या पाठी उभा राहिला बिट्टयाकाका.

मोहन परांजपे. कधीकाळी पैलवानासारखी असलेली तब्येत आता जरा सैलावून तुंदीलतनू व्हायला लागलेला. केसांचं आता अळूचं पान झालेलं ,लहानपणी घरच्या बिट्टीच्या झाडाची फुले आणि बिट्टया गोळा करायला सायु दुडदुडत्या पायांनी यायची, नाकावरून पालथी मुठ फिरवत म्हणायची
“काका ,बिट्टया हव्या, चल गोला कलू”

मग नावच पडलं बिट्टयाकाका.  तर बिट्टयाकाकाच ठाम उभा राहिला. सायु संस्काराची पोरगी आहे, तु जन्म दिला असशील राजू पण मीही पोट्टी मानलीच नं तीला, काही काळजी करू नकोस , पुण्यात थत्तेंशी झालय बोलणं मगाशी, राहायची सोय होईल तिथच, एस.एन.डी.टी ला घालूया, रानडे इन्स्टिट्यूट जवळच आहे थत्तेंच्या. चार पैशे मोजूया जास्त थत्तेना, घेतील काळजी बिनघोर रहा, माझी सायु शिकतीय शिकु दे मनासारखं”

सायुची जापनीज शिकण्याची इच्छा पुरी झाली ती बिट्टयाकाकामुळेच.  तीन वर्षानी सायु  शिकवायलाही लागली. दरम्यान आनंदचा झंझावातासारखा सायुच्या जीवनात झालेला प्रवेश, गिर्यारोहणावेळी झालेला परिचय, आणि नंतर प्रेमाची कबुली एकमेकांना. सात आठ महिन्यानंतर घरी लागलेली कुणकुण. राजूपेक्षाही मनिषानी केलेलं तांडव, आणि राजूच्या सांगण्यावरून सायु बिट्टयाकाकाकडे येऊन राहिली. बिट्टयाकाकानी, थत्तेंच्या मदतीने परीचयातल्या माणसांकडून काढलेली माहिती. नंतर आनंदशी झालेलं बोलणं , आणि स्वतः वैद्यांकडे जाऊन केलेली बोलणी ,राजू मनिषाला सायुचं भाग्य कसं उजळलय, आणि आनंद सायुचं संयम बाळगून केलेलं प्रेम हे पटवून देणं,  त्याचाच परिपाक आज सायु बिट्टयाकाकाच्या कुशीत हमसत होती.

हळूहळू सगळीच जवळ आली , आणि मग सायुसाठी हमसू लागली. आनंदच्या बाबांनी हळूहळू , राजू , मनिषा, बिट्टयाकाकांचा निरोप घेतला.  गाडीच्या काचेतून गालावर आसवं गळणारा चेहरा, आणि हलणारा हात दूर गेल्यावर राजूने एवढचं विचारलं
“ का रडवलीस सायुला जाताना ? अं ?  

“ ऐक राजू, आज आनंदचा फोन आला होता. म्हणत होता, सायु आणि माझ्या लग्नाशिवाय , लग्न होईस्तो दूसरा विचारच नव्हता मनात काका. पण मांडव परतणीला तुमच्या कुशीतली सायु बघितली, तुम्ही तुमच्या सायुकरता केलेलं सगळं आठवलं आणि त्या क्षणी जाणीव झाली. तुमच्या लाडक्या सायुची काळजी घ्यायची , आनंदात ठेवायची आणि प्रत्येकवेळी तिच्या पाठीशी उभी रहाण्याची जबाबदारी ह्या क्षणापासून माझी झालीय. काका आजपासून बिट्टयाकाकाचा रोल माझ्याकडे आलाय , काका मला मदत कराल नं ?
सायुचा बिट्टयाकाका व्हायला. आनंदला बोललो , जावयबापू, वैद्यांनी आमची पोट्टी नेली, पण वैद्यांचा पोट्टा आता जोशांचा झालाय. सायु आणि तु वेगळे आहात कारे माझ्यासाठी, २४ तास बिट्टयाकाका तुमचाच आहे”
राजू मनिषा भारावून बघत राहिले बिट्टयाकाकाकडे .

विवीध विषय विवीध त-हा,
लेखकांची इथे मांदियाळी
क्षणात कधी तर कालावधीने ,
झट झट जे लिहीती ओळी 

कुणी लिहीती गंभीर काही ,
करीत काही तात्वीक चिंतन
कुणी लिहीताना आणती आव ,
केले जणू वैचारीक कुंथन 

कुणी टाकूनी फोटो लिहीती, 
जंगलकथा विस्मयचकीत
कुणी लिहीती लडीवाळ कवीता,
गात्रे व्हावी सारी रोमांचीत 

कुणाचा असे हातखंडा ,
अश्रु उभे करती डोळ्यात
टचकन कुणी मारती अस्खलीत टोमणे,
सुंदर काव्यामधूनी सटकन 

लिहीती  पाककृतींवर झणझणीत,
कधी अगदी गोड गुळूगुळू
कुणी लिहीती खंडीभर प्रेमकथा,
प्रणय असे ज्यात घुळूघुळू 

व्यावहारीक देती सल्ले कुणी,
कुणाचे जीवन अवघे भगवे
कुणी मांडती जळजळीत सत्य
रोखठोक वास्तव नागवे 

कुणी असतो मनात शायर,
नग्मे बिग्मे शायरी लिहून जातो
अजरामर गाण्यांच्या आठवणी
कुणी असा सुखावून जातो 

कुणास सुचती दोनोळ्या,
अर्थवाही अन एकोळ्या
कुणी हसवती कुणी सांगती
सार अवघे त्या चारोळ्या 

या लेखकांमधला असे एक मी ,
जरा बरा जरा वेडा
पटवर्धनांच्या पोस्टीत डोकावणारा
जणू एक शेंबूडकीडा

वाचत गेलात सारे तुम्ही,
खरडताना काही बाही
दिलीत दाद स्नेहभरी,
कधी केली तक्रार नाही 

असाच येईन पीडण्या पुन्हां,
उत्साहाचे वारे भरले
लोभ असू द्या असाच मंडळी
सर्वांचे व्हावे चांगभले  __/\__

रविवार दुपारी पोटात कावळे कोकलायला लागले होते. मोबाईल किणकिणला. राहूल्या कॉलींग. 
“काय रे ?”
“काका, कुठे आहात ? क्रिटीकल प्राब्लेम आहे”  राहूल्याच्या तोंडी क्रिटीकल वेग्रे, हे म्हणजे डायरेक्ट सनबर्न सहभागी मेंबराचे तोंडून भीमरूपी महारूद्रा ऐकण्यासारखेच. विषय सिरीयस असला पाहिजे. 

“अरे संध्याकाळी नाही का चालणार ? जेवायची वेळ झाली आता”
“ काका , या नटराजला, वाट पहातोय”  गेलो तर राहूल्या हताशहोत्साता होऊन बसलेला.
  “काका, मला सल्ला हवाय. आहे हा जॉब सोडायची इच्छा आहे” ( राहूल्या स्टांपव्हेंडरकडे हरकाम्या पोरगा आहे, भाषा बघा ) मला इथे अर्नींग आहे पण जॉब स्याटीसफ्याक्शन नाही. मेन्टल बॉदरेशन नसलं तरी फिजीकल स्ट्रेस फार आहे हो. तुम्ही एकाच जॉबवर इतकी वर्ष कसा काय टिकलात” 
वेटरला स्वीट कॉर्न सूप आणि पनीर मांचूरीयनची ऑर्डर देऊन मी विचारलं
  “ राहूल्या , हे बघ इथं फायनान्शीयली साऊंड आहेस नं ? असणारच. मग थोडं सहन करायला हवं , आत्ता तर आठवा महिना आहे जॉबचा “
  “काका, टिकायचं कसं ते तर सांगा” ( डोळ्यात बारा सश्यांची व्याकुळता साठलेली  किंवा सिदन्ती मम गात्राणी , मुखंच परिशुष्यती अशा स्वरूपातला अर्जुन )  इथे माझी सॉल्लीट गोची. भुमीका उपदेशकाची , पण मलाच ठाऊक नाही मी नोकरीवर टिकलो कसा ? साहेबांनी इतकी वर्ष नोकरीवर ठेवलाच कसा हे नकळलेल्या असंख्य कोड्यातलं एक कोडं आहे. असो .
मग एक दीर्घ श्वास घेतला. दृष्टी अंतराळी स्थिर केली. मनी परमश्रद्धेय Aniruddha Damleबापू डोम्बवलीकरांचं स्मरण केलं . एक दिव्य विचार मनःपटलावर उमटला आणि शब्दांचं रूप घेऊन वाणीतून अमृतरूपाने स्त्रवू लागला. 
“हे अजाणा, तुजला सांप्रत प्राप्त कर्माविषयी घृणा उत्पन्न झालेली दिसत आहे. “
  “काका , मला अन्डरस्टँन्ड होईल असं बोला हो , विनंतीलाईक रिक्वेस्ट समजा “
  “तर आता मला सांग , माझ्या आंतरदृष्टीने दिसतय की कामाबद्दल त्रास नाही , त्रास आहे तो बॉसचा करेक्ट? “ “हो , हो , एक्झाक्टली, काका यू आर ग्रेट”
“ हं, तर पहिले एक कर , बॉस आणि जॉब प्रेयसी आहे असं समजायला सुरूवात कर.लव्हर रे लव्हर, हं छावी समज.”
“ऑ ?????”” (आ वासल्यावर माव्याने गंजलेल्या दातांचं विश्वरूपदर्शन झालं तिकडे दुर्लक्ष करीत )

“हे मूढमती सांगतो. फार प्राचीन काळी महर्षी किशोरजींच्या सुस्वरात गायलेलं , लेखनाचार्य गुलशनजींच्या लिखाणातून साकार झालेलं गीत समजून घे. निव्वळ तुझ्या कल्याणासाठी लिहीले गेले आहे. तु जिथे विद्वान समजलां जाशील ते यांस प्रेमगीत संबोधतात.त्यांच्या अल्पस्वल्पबुद्धीला नगण्य काळातले युवावयीन छचोर प्रेम जाणवते, तो त्यांचा नसून त्यांचे बुद्धीचा दोष आहे. हे बंधूपुत्रा  खरा अर्थ सांगतो तो समजून घे.” 
कितने भी तू कर ले सितम
हँस हँस के सहेंगे हम
ये प्यार ना होगा कम
सनम तेरी कसम 
एकदा बॉसला प्रेयसी मानले की मग एक दृढ भावना मनी जागृत होते, कितीही कामं सांगा, वैतागणार नाही, हसून सहन करू. पण एक लक्षात ठेवायचं पटकर्न हो म्हणायचं नाही,छावी नखरे करते तेव्हा कसे करतो ? तसच आढेवेढे घेत, नकारात होकार दाखवत. अरे हम भी कुछ है के नही. 
जितना तडपाएगी मुझको
उतना ही तड़पेगी तू भी 
जो आज है आरजू मेरी
वो कल तेरी आरजू होगी
ये झूठ नहीं, सच है सनम
सनम तेरी कसम 
कामामुळे जेवढा त्रास देशील तेवढाच त्रास तुला होईल , तो मी देईन ना, ह्या ह्या ह्या. मला जशी निवांतपणाची इच्छा आहे ती इच्छा उद्या तुम्हालाही होईल, ही धमकीवजा सुखाची कल्पना स्पष्ट करायची  
नफ़रत से देखना पहले
अंदाज प्यार का है ये
कुछ है आँखों का रिश्ता
गुस्सा इकरार का है ये
बड़ा प्यारा है तेरा जुल्म
सनम तेरी कसम 
शेवटी  जाता जाता शॉट लावायचा, तुम्ही सांगीतलेली कामं त्रासदायक असूनही मी का करतोय तर आत्ता डोळे वटारता, रागावता , पण मला माहितीय कितीही नाटकं केलीत काम करवून घेण्यासाठी तरी प्यार के तोहफे मे आप मुझे इन्क्रीज इन स्यालरी एन्ड बोनस अँट दिवाळी टैम देणार आहात.” 
तस्मात हे बंधूपुत्रा, लेखनाचार्य गुलशनजीनी लिहीलेल्या या जॉबतारक गीताचे, मनन ,पठण , आचरण समजून उमजून चर आपलं कर की जेणेकरून मारवाड्याचे बूड वर्षोनवर्षे गल्ल्यावरच स्थापीत रहाते, तद्वत  तुझेही बूड एके ठिकाणी स्थीरस्थापीत होईल, जॉब सँटीसफँक्शन मिळू लागेल.   ( तळ टीप -  या रविवारी दोन महिने झाले.पुन्हा मोबाईल किणकिणला नाही. राहूल्या सुखात असणारच , हल्ली आसपास दिसला तरी आदराने नजरेला नजर देत नाही. आजूबाजूला बघत जातो. एक नक्की पण या दिव्य संदेशापोटी  मेथी मटर मलाई, व्हेज हैद्राबादी [ इन सांगली स्टाईल ] बटर रोट्या, कर्ड राईस,  पोटी पक्षी उदरी स्थिरावलं, जय हो परमश्रद्धेय अनिरूद्ध बापू डोम्बवलीकर __/\__)

टप्प्याटप्प्याने झालेला प्रवास, वर्षातून एकदा मिळणारं निवांतपण, बरोबर दगड , विटा, सिमेंटातले म्हणजे बांधकामाशी संबंधीत मित्रमंडळी. तीही आपापली पाट्या दप्तरं कंपासपेट्या घरीच सोडून आलेली. यहां के हम सिकंदर , चाहे कर लो दुनिया अपनी जेब के अंदर अश्या मुडात आलेली.

संध्याकाळी हर्णेच्या सागरकिनारी , क्रिकेट, आबाधुबी खेळून, लाटा अंगावर घेऊन ,परत ठिय्यावर आलेली.  चार लाकडं, पालापचोळा , काटक्या पेटवून , गोलाकार बसलेली. निवांत होण्यासाठीची सर्व “तयारी” सुरू झालेली. गप्पा स्थानीक राजकारणावर आल्या. समोर अथांग समुद्रकिनारा असताना या विषयावर वेळ घालवण्याची माझी तरी इच्छा नाही. 

थोडं पलीकडे चि-यांचा एक कट्टा, नारळीच्या खाली. समोर पुळण. अंधारल्या वातावरणात ,मधूनच गार झुळूका. कटट्यावर बसण्याऐवजी, कटट्याला टेकून वाळूत बसलो. खुप दिवसांनी एकांत. अविरत गाज कानावर. समोर अगणित आश्चर्य पोटात दडवलेला, उसळत्या लाटांनी फेसाळणारा समुद्र, हातात फेसाळणारी फोस्टर्स. तंद्रा न लागावी तर नवल. 

थोडी सळसळ, हालचालीची चाहूल.

पलीकडचं कौलारू घर. समोरचं अंगण, कुणी एक सुकोमल तन्वांगी अंगणात. अंधारल्याने स्पष्टता नाही.

कट्टयावर बसलेला नसल्याने माझी जाणीव तिजला नाही. निशंक . जराश्याने सोप्यात बसलीय. बाजूला काही फुलं, पलीकडच्या म्लान ट्यूबलाईटची एक तिरीप तिच्या थोड्या अंतरावर. पिंगट केस मोकळे सोडलेले. सराईत बोटांनी फुलांची वेणी गुंफणं सुरू. आकृतीबंध वेडावणारा, मधेच कुणी मारलेल्या हाकेला ओ देऊन , सळसळणा-या नागीणीसारखं सरसरत घरात जाणं. जाताना क्षणभर दिसलेला चेहरा, अप-या नाकाची नोंद मनात. 

अवघ्या पंधरा वीस मिनीटांचा खेळ . ती गेल्यावर थोडावेळ सागराकडं दृष्टी लावून .मनात सौख्यकारक विचारांच्या लाटा.काही कधीच पूर्ण न होणा-या स्वप्नांची मालीका. 

असाच काही काळ जातो. मी पुन्हा मित्रांच्यात. समोरचे चषक ही नाकारतोय. आगळ्याच धुंदीत मी. असेच शब्द सुचू लागतात. आणि र ला ट जुळू लागतात 

धुंदी कशाची मजला कळेना
आले कशाने हे झिंगलेपण
पुन्हा पुन्हा का धुंद कळेना
विसरून जाई मी माझे मीपण

चाहूल अल्लड  येई सोनेरी
अलगद मनास सुखवून जाते
नयनी साठवू सळसळ पानेरी
की काय करावे मज ना गमते 

सहवास तुझा गं पळभराचा
परि गात्रे अवघी उचंबळती
क्षण अवघा मत्त आनंदाचा
ह्रदयमंदिरी सौख्याच्या ज्याेती 

या मत्त घटकेची धुंदी आगळी 
क्षणाक्षणाने झिंगून जावे
आयुष्य आठवणीची झळाळी
कुरवाळीत तिजला बसावे