Saturday, 10 September 2016

नृसिंहजयंती नदिवर डूंबणं, नेहरू गार्डन किंवा शिवाजी गार्डनमधे खेळणं , आत्ये मामे मावस भावंड भेटणं , आंबे कलिंगड आणी दुपारी ए आले लिये वाले लाये मलायवाले कुल्फीये असली अगम्य आरोळी मारणा-या कुल्फीवाल्याची मलई किंवा मॅगो कुल्फी खाणं हया सगळया आनंदाच्या गोष्टी घेऊन मे महिना यायचा . याच मे महिन्यात अण्णा आज्जीनी आठवण करून दिली की साने गुरूजींकडे जाऊन यायचे नृसिंह जयंतीच्या पाठाचे निमंत्रण करायला. आमचं कुलदैवत लक्ष्मी नृसिंह . नृसिंहजयंतीला घरी शांतीमंत्राचा पाठ व्हायचा. आधीच्या रविवारी घरातली बैठकीची खोली सारवून घेतली जायची. खिडक्यांच्या काचा ओला खडू फिरवून नंतर ओल्या आणी कोरडया वर्तमानपत्राच्या कागदानी लख्ख केल्या जायच्या. नृसिंहजयंतीला सकाळी बाजारातून कै-या आणायच्या. पण त्या साखरांब्यासाठी खोबरी कै-या आणायच्या तशा नाहीत. कैरी कांदाच्या कोशींबिराला लागतात तश्या आंबट गावठी कै-या. काळाराम मंदिराजवळ आणि तिळभांडेश्वराच्या आवारातल्या दोन्ही काळया पत्थरातील सर्वांगसुंदर लक्ष्मीनृसिंहांचं दर्शन घेऊन यायचं . आज दोन्ही मुर्तींना चांदिचे डोळे. मिशा आणी जीभ लावलेली असायची. ती शोभा वेगळीच , उग्ररूप एकदम शांत घरातल्या वृद्ध मंडळींसारखं आर्शिवादी रूप वाटायचं. घरी दुपारची जेवणं होऊन तासभर आडवारलं की चहा घ्यायचा आणि तयारीला लागायचं. पलंगाखालची अर्धी जागा व्यापणारी पेटारावजा ट्रंक बाहेर निघायची. त्यातून रंगीत नक्षीकाम केलेलं जाजम बाहेर काढलं जायचं . सणावाराची ठेवणीतील बेडशीटं उश्यांची कव्हरं बाहेर निघायची. चांदीच्या वाटया ग्लास तबक ताम्हन पळीपंचपात्र सगळं चांदिचच देवाकरीता काढलं जायचं . हो आणि अत्तरदाणी गुलाबदाणी पण यायची बाहेर. पूजेची उपकरणं अण्णा उजळावयाचे बाकी आम्ही लहान मुलं उजळवायचो. स्वैपाकघरात कै-या उकडणं आणी किसणं चाललेलं असायचं . मधेच लुडबूडत गूळ चिरायला माझा हटट, ( नजर चुकवून एक दोन खडे गटटम) मग गुळ वेलची आणी मोग-याच्या फुलांचा वास असलेलं माठातलं पाणी घेऊन छोटं पिंपभरून पन्हं तयार व्हायचं. अण्णांचा जुना पंचा ओला करून पिळून पिंपाला गुंडाळून ठेवला जायचा. किसलेली कैरी भिजवलेल्या डाळीबरोबर मिरच्यांच्या संगतीने डाळीच्या कोशींबीरीत परावर्तीत व्हायची. वरून चर्र फोडणी काश्याच्या पळीने आणि बारीक चिरलेली कोथिंबीरीची पखरण सर्वात शेवटी. देवाचा नैवेद्य तयार. सहाच्या दरम्यान अण्णा स्नानसंध्या करायचे. आम्ही नव्या कपडयात . आजी आई दागीन्यात. मग एकेक करीत गुरूजी यायचे, नऊ किंवा अकरा. आल्यावर प्रत्येकाची पाद्यपूजा , तांब्याच्या परातीत पायावर दूध पाणी घालून स्वच्छ पुसून कपाळी गंध आणी पायावर गंधांची स्वस्तीके काढली जायची. गुलाबदाणीतून गुलाबजल उडवले जायचे . सुवासीक मोगरा अत्तर फुलाने लावले जायचे . मग पंचोपचार पूजा देवाची . डाळ पन्ह्याचा नैवेद्य दाखवला जायचा . चंदन उदबत्ती आणी मोगरा अत्तराचा सुवासाने वातावरण प्रसन्न व्हायचे. आणि मग गुरूजींचे मंत्रपठण सुरू व्हायचे. पखवाज वाजवताना धिम्या लयीतला पखवाजाच्या घुमा-याशी नातं सांगणारं धिम्या लयीतलं मंत्रपठण . हळूहळू आवाज चढू लागायचे . काही मंत्रानंतर पाच पाच जणांचे गट पडायचे एका गटानी साद दिल्यासारखा मंत्र म्हणला की प्रतिसादाला दुस-या गटाचा मंत्र. समुद्राच्या लाटा जशा किना-यावर एकापरते एक याव्यात तश्या मंत्रोचारांच्या लाटा एकापरते एक यायच्या. तो नाद तो सुवास मंत्रपठणात होणा-या हातांच्या आणी मस्तकांच्या ठेक्यातल्या हालचाली एका वेगळयाच विश्वात घेऊन जायच्या. शेवटी सर्व गुरूजी एक एक शब्द लांबवण्याची शर्थ करीत असत आवाज टिपेला पोहोचलेले असतं . गळयाच्या शीरा तटतटलेल्या असत. ऐकताना अंगावर रोमांच उभे रहायचे मंत्रपठण संपल्यावर दोन मिनिटं सगळेच स्तब्ध निश्चल, एका तृप्त आनंदात नंतर गणपती देवी आणी नृसिंहाची आरती व्हायची. आरतीला वाडयातली सगळी गोळा व्हायची . आरतीवरून हात फिरवून डोक्यावरून फिरवताना जे काय वाटायचं ते शब्दात नाही सांगता येणार आरतीनंतर गुरूजींना आग्रह करकरून डाळ पन्हं द्यायचं त्यांचं झालं की बाकी सगळी प्रसाद घ्यायची काळ सरत गेला तशी मंत्रपाठ म्हणणारे गुरूजी कमी होत गेले शेवटच्या वेळी पाचच गुरूजी आले. नंतर फक्त देवळात अभिषेक करायला लागलो मात्र प्रत्येक नृसिंहजयंतीला आनंद सोहळा आणी समाधानानी तृप्त झालेला अण्णांचा चेहरा आठवल्याशिवाय रहात नाही

No comments:

Post a Comment