Saturday, 10 September 2016

आताशा  वाटतं कुणी तरी आपल्याशी बोलावं, वेळ द्यावा,कुणाचे चिमणे बोल ऐकावे, पण वेळ कुणाला आहे इथे सगळी आपापल्या कामात, आता कामंही उरली नाहीत पहिल्यासारखी. आधी  नव्हतं असं, रानडे वाडा म्हणजे, दिवस कसा जायचा कळायचच नाहि, घरचीच पाच जणं,आणि वाड्यात , घाटे, बर्वे, कुलकर्णी, भातवडकर तीही घरच्यांसारखीच, सुधीरशी लग्न होऊन वाड्यात आले तेव्हा फुलांच्या पायघड्या काय, अत्तराचे फवारे काय, उखाण्यांचा कल्लोळ,दणाणला होता वाडा. सकाळी सडा घालतानाच बर्व्यांची सुलभा साद घालायची, रचना तर दुपारनंतर माझ्याकडेच असायची, चिव चिव चाललेली असायची दुपारच्या चहानंतर निवडणं टिपणात मदतही व्हायची. श्रावणात विचारूच नका, सणावाराला जेवणाचं एक सोडलं तर वाडा म्हणजे एकच घर होतं, जेवणाचं तरी नाही कसं म्हणायचं? एकमेकींचे मापटी, चिपटीने अन्न जायचेच की एकमेकींकडे. नांदतं गोकुळ होतं, घरात फक्त कान्हा तेवढा नव्हता. पुढे सुधीरचे न माझे बिनसले न सगळंच बदलत गेलं, मेहतांकडे सुधीर जायला लागल्यापासून , घरी पैसा खेळायला लागला, माझ्यावाटेला सुधीर यायचा तोही रात्रीपुरता. सकाळी आवरून बाहेर पडला की रात्री उशीराच घरी.आणि मधे भातवडेकरांच्या मधूने सांगितलं की सुधीर कुणाबरोबर तरी फिरताना दिसला, तशी मी सैरभैर झाले, बघितलं असशील दुस-या कुणाला म्हणून दिलं सोडून. पण चार पाच वेळा कानांवर आल्यावर कडाडलेच, सुधीरनी कबूल केलं नाही पहिले, पण नंतर बांध फुटला माझा तशी झाला कबूल, मागच्या विहीरीपाशीच, चांदण्यात वीज कोसळली त्याच्या शब्दांनी. सुधीरनी त्याच्यापुरता विषय शांत केला. पण नंतर  सगळं चित्रच बदललं, काय सांगितलं होतं सुधीरनी वाड्यात , देव जाणे पण कुजबुजी वाढत गेल्या, मी बघत होते पण कुणी माझ्याकडे बघत नव्हते, जणू मी त्यांच्यांत नव्हतेच. पहिले कुतुहल वाटायचं काय बोलतायेत, नंतर संशय येत गेला, नंतर राग येत गेला पण काहीच करता येत नव्हतं, सुधीर सीमाला घेऊन आला तेव्हां मनाशी ठरवलं आता संपलं सगळं, नशीब म्हणायचं न सोडून द्यायचं. पण वाटायचच, कुणीतरी यावं , विचारपूस करावी , बोलावं तरी दोन शब्द, तशात मधूचं लग्न झालं , आणि गोड, चित्रासारखी प्राजक्ता वाड्यात आली, निरागस अवखळ मन, संसाराची स्वप्नं होती डोळ्यात तिच्या. एका संध्याकाळी जाऊन उभीच राहिले तीच्यासमोर. ओळखलं नाही तीनं मला, पण माझी ओळख तरी कोण करून देणार? मीच बोलले घडाघडा, मारल्या गप्पा, मग गट्टी जमली ,संध्याकाळी प्राजक्ता यायची इथेच विहीरीपाशी, सासुनी हाका मारल्या की जायची, काय करणार नं बापडी, पण यायची रोज, एकदा मग माझ्या मनात आलं , आपण संध्याकाळीच का बोलायचं ? कायम का नाही? मग आठवला मला सुधीर, त्यानी मला बोलून शांत केलं तसच प्राजक्ताला मी बोलून शांत केलं , इथेच विहीरीपाशी. ती असायची मग माझ्याबरोबर. आणि गंमत म्हणजे माझ्यापाशी जशी यायला लागली तशी माझ्यासारखचं तिच्याबाबतीत घडलं, अगदी तस्सच, पहिले कुजबुज, नंतर प्राजक्ता नाहीच असं समजून वावरायला लागली, आम्ही दोघी मग बसायचो गप्पा मारत. एक मात्र झालं ,सुधीरपासून  सीमाला दिवस गेले आणि माझ्या आनंदाला उधाण आलं, काही झालं असलं तरी सुधीरचा अंश होता पोटात. मग नाही रहावलं मला , सीमाकडे गेलेच मी, तिला घाम फुटला, थरथरत होती , पण तिच्याशी बोलले ,घडाघडा सांगितलं , बिनसलय ते सुधीरशी , तुझ्याशी नाही गं, पटलय तिलाही , आता संध्याकाळी मी, प्राजक्ता न सीमा गट्टीच जमलीये चांगली, तिच्या विहीरीकडे येण्याबद्दल कुजबुजत होती मंडळी, आता तर बर्वे, घाटे , कुलकर्णींनी वाडाही सोडलाय. लाघवी आहे हो सीमा. आताशा वाटतय कुणीतरी वेळ द्यावा , बोलावं , सीमाचा कान्हा मजकडे यावा, बसलीय इथे विहीरीपाशी विचार करत, सुधीरनी मला दूर करण्यासाठी विहीरीत लोटलं, मी प्राजक्ताला जवळ येण्यासाठी लोटलं, मंडळी कुजबुजणारच, सीमाचा कान्हा माझ्यापाशी यायचा असेल तर सीमालाही जवळ घ्याव लागेल ना आता. आताशा  वाटतं कुणी तरी आपल्याशी बोलावं, वेळ द्यावा,कुणाचे चिमणे बोल ऐकावे.

No comments:

Post a Comment