Saturday, 10 September 2016

नेहरूचौकाकडून येणा-या उतारावरून जाताना मुर्तीकार लोंढयांच्या दगडी पाय-यांवर पणत्यांचा मंद प्रकाश दिसला की त्रिपुरारी/ त्रिपुरी पौर्णीमेच्या आनंदोत्सवाची सुरूवात व्हायची. दिवाळीपासून बोचरी थंडी जाणवू लागलेली असायची. गंगाकाठावर फिरताना गार वा-याने थंडी चांगलीच जाणवायची. उतारावरून खाली कपूरथळयाच्या मैदानात आलं की समोर गंगेचं पात्र उजव्या हाताला ठेवून रामकुंडाकडे जायला सुरूवात करायची. खंडोबाचं पाचसात पाय-या खाली उतरून दर्शन घ्यायचं , चहूबाजूनी पणत्या तेवत असायच्या. भंडा-याने माखलेला खोब-याचा प्रसाद घ्यायचा. रामसेतू पुलापाशी जाताना डाव्या बाजूला सत्तर पंच्याहत्तर फूट उंचीच्या संरक्षक कोठावरून जुने वाडे दिसायचे. प्रत्येक वाडयाच्या , घराच्या देवडीत पणत्या आणी समोर आकाशकंदील दिसायचे. एव्हाना अंधार पडून , पौर्णीमेच्या चांदण्याने आणी काठावरच्या हॅलोजनमुळे गंगेंचं पात्र चंदेरी छटांच्या लाटा मिरवायला लागायचं.रामसेतू पूलाखालून जाताना गंगेचा खळाळ आवाज कानावर पडायचा. पुढे चालत आलं की दहाव्याचा पिंपळपार, एरवी तेलाने माखलेल्या मारूतरायाच्या दर्शनाने भितीदायक वाटणारा. आज पणत्यांच्या उजेडात शांत मुद्रा धारण करून असायचा. त्रिपुरी पौर्णीमेला आज गंगेच्या दुतर्फा असलेल्या काळयाशार पत्थरांच्या देवळातून , समाध्यातून पणत्यांची रोषणाई बघायला मिळायची. नारोशंकर मंदिर , तालीम, गो-या रामाच्या पाय-या ,देव मामलेदाराची समाधी , त्यामागच्या वाड्यांच्या पन्नास पन्नास साठ साठ पाय-या , रोकडोबा तालीम , अहिल्याबाई व्यायामशाळेच्या पाय-या सगळीकडे मंद तेवणा-या पणत्या. नी मोठे दिवे. एकमुखी दत्तांच्या प्रांगणात पणत्या ठेवून ॐ 卐 समई, चक्र ध्वज गोपद्मे अश्या आकृत्या उजळवलेल्या असायच्या. गंगा गोदेचा खळखळाट ,बोचरं वारं , पायाखालच्या थंडगार कातळी फरश्यांचा स्पर्श, असंख्य दिवे पणत्यांच्या उबदार अस्तीत्वाने मनावर गारूड व्हायचं . किती पाहू न किती नको व्हायचं. रामकुंडावर आलं की समोर कपालेश्वराच्या पाय-या . पाय-यांच्या दुतर्फा दूई हाताच्या ओंजळीइतक्या आकाराच्या पणत्या, दोन दोन बोटं जाड वातींनी उजळवलेल्या. गंगेच्या खळाळणा-या पात्रात असंख्य श्रद्धाळू माताभगिनींनी सोडलेले पळसाच्या द्रोणांचे एकवाती दिवे तरंगत तरंगत पुढे पुढे जाणारे .अशातच गोदामंदिराच्या पुढे कंबरभर पाण्यात उतरलेले सुस्नात पूजारी आरतीच्या ताटात दोन्ही किना-यावरून दिसेल एवढया मोठ्या प्रमाणात कापूर पेटवून आरती सुरू करायचे " ओम जय जगदीश हरे , स्वामी जय जगदीश हरे , भक्त जनोके संकट , स्वामीजनोके संकट पलमे दूर करे , ओम जय जगदीश हरे". ताल धरत आरती म्हणताना पाय गंगा गोदेच्या पाण्यात .तीच्या प्रेमळ सहवासाने अवघ्या देहावर रोमांच उभे रहायचे . ती गोदामाता , ते भारावलेलं वातावरण , आणी काठांवर असलेल्या देवतांची ही देवदिवाळी संपूच नये असं वाटायचं

No comments:

Post a Comment