Tuesday, 21 February 2017

शाळा कॉलेजचे दिवस कायम आठवणीत रहातातच. धमाल दिवस. फक्त कंटाळवाणा कार्यक्रम एकच. शिकणे. पण जायला लागायच तें त्याकरताच. लाकडी बेंचवर एकाजागी बसून शिकण्यासारखा जुलूम नाही. मास्तर, मास्तरणी खूप छान शिकवणा-या होत्या. पण आमच्या अकलेची करवंटी उपडीच सदैव. आत काय शिरणार. माझे मित्र ही माझ्यासारखेच.मग विरंगुळ्याचे काही प्रकार सुचत गेले.  

सोहोनी सर हिंदीचे. अस्सल सानुनासीक हिंदी, मराठी कॉम्बीनेशन नी शिकवणं असायचं त्यांना नाव पडलं उंट. एखाद्याला उभं रहा सांगताना “अरें उंठ, तकल्लूफ कां मंतलब क्यां? समजलं का ? असं शिकवायचे.त्या उंठ वरून नाव उंट. फळ्यावर गिरगिटायला लागले की कुणीतरी मागनं ओरडायचा उंट, शिकवणं सोडून सानुनासीक अपशब्दांचा भडीमार २० मिनीटं , तास संपायचा. 

एकतारे सर, अत्यंत अभ्यासू, रसायनशास्त्र मुख्य विषय. आणि पार हस्तसामुद्रीक, तारे ग्रहगोलापर्यंत वैश्वीक माहिती मन लावून शिकवायचे. विद्यार्थी सर्वांगीण तयार व्हावा ही इच्छा. एकदा बेडूक विषय शिकवताना , हाताच्या तळव्यावरचा अमूक उंचवटा शुक्राचा असून तो फुगीर मांसल असेल तर सौंदर्याचा उपभोक्ता असणारी व्यक्ती असते, असं सांगितलं तिथून त्यांचं नाव पडलं शुक्राची चांदणी. 

मराठीच्या बाईंना लडिवाळ नाव पडण्याचं कारण , “कळलं नं मी काय म्हणतेय “अश्या चालीत म्हणायच्या जणू अहोंना गडे पैठणी  हवीय मला द्याल ना असं विचारतायत. 

पी.वाय.कुलकर्णींना बाळू नाव पाडणा-याला शंभरपैकी ९८ गुण. पर्फेक्ट शामची कॉपी, सत्शील मास्तर . सुंदर मला समजेल असं शिकवणा-या मास्तरांना बाळू नाव ठेवल्याबद्दल २ गुण कट.

आता आडनाव आठवत नाही , पण इतिहासाला सर होते, नाजूक चणीचे , गोरे घारे, रात्रीच्या जागरणांमुळे असेल पण शिकीवताना जांभया द्यायचे , आळस झटकायचे. बाळ्या पेंडश्यानी “क्या यार ये बंदा तो अनारकली की तरह अंगडाईया ले रहा है, असं म्हंटल्यावर नाव पडलं ,अनारकली . 

शेक्रेट्रीयल प्राक्टीस शिकवणा-या बाई एकारांत. शिकवायच्या मन लावून . पण उकारी शब्द उच्चारताना ओठांचा चंबू करायच्या , हल्ली सेल्फ्या मारताना करतात तसा. त्यांचं नाव पडलं पप्पी. 

गोगटे म्याडम , विनायक गोविलकर , वि.भा. देशपांडे आदराची स्थानं . विनायकराव संघाच्या मुशीतले .स ष श क्ष चे सुस्पष्ट उच्चार सुधीर फडकेंसारखे. स इतक्या स्पष्टतेनी यायचा जणू शीळ वाजतेय. मग त्यांना नाव शिट्टी.  इकॉनॉमीक्सचे वाय.के. डेंजर प्रकार, डायसवर एकदम सेफ माणूस, पण डिक्टेशन देत क्लासरूमला हिंडायला लागले की हात, नोटबुकं सांभाळायला लागायचे, चक्क दाताच्या ठेवणीमुळे बारीक बारीक थेंब उडायचे थुंकीचे, वाय.के . ओळखले जायचे तुसिंमा ( तुषार सिंचन मास्तुरे ) 

वास्तवीक ज्यांच्यामुळे आमचे विरंगुळ्याचे क्षण सफल झाले असते त्यांच्याबाबतीत नाव पाडलच गेलं नाही. कारण त्यांचा प्रांजळपणा मनात घर करून गेला. वर्गातलं पहिलच बोलणं होतं “ मी यंगनाथ, मला लहानपणापासून य म्हणता येत नाही. माझा य चा उच्चाय य असा होतो. तुम्ही समजून घ्याल इतपत मोठे झालायत. तय पुथ्वी सूय्याभोवती गयागया फियताना चंद्यामुळे ग्यहण कसे होते ते आज शिकूया.  ( गुरूजनांनी शिकवले त्यांच्यामुळेच दोन घास खावू शकतोय. आदर मनात होता, आहे. त्या वयाचा परिणाम होता इतकच)

No comments:

Post a Comment