“तुम्हां नवीन पीढीला नवीन विचार करायचे कष्ट नकोत, पूर्वसूरींनी काही म्हंटलं की ओढलीच तुम्ही री “ आचार्य सात्वीक संतापाने बोलत होते (म्हणजे उखडून)
“मुळात तुम्हांला विचारच करायला नको. परमेश्वरानं खांद्याचे वर एक पूसायचा अवयव दिलाय, त्याच्याही वर अवयव दिलेत ते वापरा रे, डोळे, कान , मेंदू वापरा”
“आचार्य , संदर्भ लक्षात येईना”
“हे बघा , मुळात संधीप्रकाशात या शब्दाचा अर्थच कळला नाहीये ,संधीप्रकाश संध्याकाळचा, म्हणून मृत्युशी संबंध जोडताय,लेको, हे घे वाच , संधीप्रकाशात लिहीताना बा.भ.बोरकर पोएट होते हे लक्षात घे, तुमच्यासारखे पोपट नव्हेत, पोपटपंची करणारे”
आचार्यांना उमगलेली संधीप्रकाशात कवीता पुढीलप्रमाणे.
“यां निशां सर्व भूतानां , तस्याम जागर्ती संयमी” सा-या मर्त्य जगातील भूत म्हणजे जीव ढाराढूर पंढरपूर लंबायमान झालेले असतात, बरोब्बर त्याचवेळी संयमी जागृत असतात. जसे की साधूपुरूष आणि कवी.या शांत वातावरणात, चिंतन करून नवनिर्मीतीचे प्रयत्न सुरू असतात. एक वेगळी कल्पना, वेगळे काव्य , वेगळे आयुष्य कवी मंडळी जगत असतात. प्रास, अनुप्रास, वृत्त , मात्रा, स्वच्छंद यात मनातली निर्मीती बद्ध करण्याचा ध्यास असतो. उत्तर रात्री केव्हां तरी कवी निद्रीस्त होतो.
जगाची सकाळ लवकर झाली तरी कवीची निद्रा अपूर्ण असल्याने त्याला पुन्हा झोपावेसे वाटते. नेमकी हीच भावना संधीप्रकाशात या कवीतेत कवीने यथार्थ मांडलीय.
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
__________________
कालच्या रात्री जे वेगळ्या निर्मीतीतलं आयुष्य कवी जगला , त्याची उगवतीला झालेली मावळण म्हणजेच उजवण झाली आहे. नवनिर्मीती साध्य झाल्याने अता प्रत्येक क्षण अमृतासमान गोड. नवनिर्मीत कवीता मनांत घोळते तीची बिंब , प्रतिबींबही गोड , सुखावणारी वाटतात कवीला.
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
__________________
आता त्या निर्मीतीचा आनंदाचा सुखाचा उत्सव सुरू आहे. जगाच्या रूढींचा पिंजरा तोडून भर दिवसा निद्रेचे द्वार उघडावे ही इच्छा कवी नमूद करतो.
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
____________________
(ज्या शब्दांची उकल झाली नाही तो शब्द म्हणजे संधीप्रकाश. केवळ त्यामुळे पूर्वसूरी एकाच वाटेने विचार करीत राहिले. दोन कालातील संधीतला प्रकाश म्हणजे संधीप्रकाश , कवीला अभिप्रेत , रात्र आणि दिवस यांच्यामधला पहाटेचा संधीप्रकाश आहे हे नक्की )
या पहाटेच्या संधीप्रकाशात सोन्यासारखं दिसणारं सूर्यबिंब आहे, तोवर पुन्हा माझे डोळे मिटावेत झोपायला. ( नंतरचा टळटळणारा सूर्य बघून डोळ्यांची खाचरं का कराच्चीयेत ) झोप येईस्तो नवनिर्मीत कवीतेचे भास , सहजपणे आठवत रहावेत. आठवणीने कासावीस न होता झोप मिळावी.
तेह्वा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे
_____________________
डोळ्यावर निद्रेचा अंमल सुरू होताना, कवी सखीला सांगतोय तुळशीचे पान द्यायला. दंतधावन न करता कवी पुन्हा निद्राधीन होणार असल्याने ,तुळशीचे पान चघळावे ही इच्छा स्वाभाविक आहे. तुळशीबरोबर खरे तर ओव्याचे पानही सखीला मागीतले असावे. दुर्गंधी दूर होण्यासाठी. मात्र मीटरमधे बसत नसल्याने तुळशीचे पानच असावे. सकाळी पुन्हा झोपायचे असल्याने चहा वगैरे पिण्याऐवजी, तूच ओढलेले पाणी दे असे कवी सांगतो. तूच ओढलेले का ? तर तू अन्य कुणाला सांगीतलं , मग त्यानी आणि कुणाला सांगीतलं तर पाणी मिळण्यासाठी उशीर होईल . कवीला तर लवकर झोपायचं आहे. म्हणून तूच ओढलेले , हे ठाम पणे कवी सांगतो.
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली
____________________
अश्या रितीने तुळशीचे , ओव्याचे पान खाऊन पाणी पिऊन , कवी भुलीतली भूल सखीकडे मागतो. नाहीतरी वस्सकन तोंडावरचे पांघरूण ओढून निद्रेतून जागी करणारी सखी कवीला माहिती आहे. तिलाच कवीची विनवणी हे शेवटचे झोपू दे. ( कुठलाही हट्ट धरताना , हे लास्ट टाईम म्हणल्याशिवाय हट्ट पूरा होत नाही नं, सो भुलीतली भूल शेवटची. पुढच्या वेळेसही कवी हेच वाक्य पुन्हा म्हणेल)
वास्तववादी समीक्षक आचार्यांचा निरोप घेतला. दुसरं काय करणार
No comments:
Post a Comment